Navi Mumbai Flats : मुंबईनंतर आता नवी मुंबईचे महत्त्व झपाट्याने वाढले असून, आधुनिक सुविधा आणि वेगवान विकासामुळे ती महामुंबईच्या दिशेने पुढे जात आहे. काही वर्षांपूर्वीची नवी मुंबई (Navi Mumbai) आणि आजची नवी मुंबई यामध्ये मोठा बदल झालेला स्पष्ट दिसतो. नवी मुंबईत गृहप्रकल्पांची वाढती संख्या आणि विविध विकासकांची गुंतवणूक पाहता सिडकोही या स्पर्धेत मागे राहिलेली नाही. उलट, नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासात सिडकोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या सदनिका (Affordable flats) निर्माण करून शहराचा विस्तार साधण्यातही सिडको आघाडीवर आहे.
गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये नेहमीच भरपूर गुंतवणूक करत असणाऱ्या सिडकोला सध्या काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण, नेहमीप्रमाणे जोरदार प्रतिसाद मिळणाऱ्या सिडकोच्या सध्याच्या सोडतीकडे (Cidco Lottery) मात्र खरेदीदार फारसे आकर्षित झालेले नाहीत. घर घ्यायची इच्छा असूनही अनेकांनी या सोडतीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे, या या मागची नेमकी कारणं काय आहेत, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचा आहे.
वाशीतील घरांना अपेक्षित मागणी नाही – सिडकोच्या प्रकल्पास कमी प्रतिसाद का?
रेल्वे स्थानक, भाजी बाजार, मॉल आणि उत्तम वसाहत अशा सर्व सुविधा असताना देखील वाशीतील सिडकोच्या घरांना यंदा खरेदीदारांकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे घरांचा लहान झालेला आकार आणि मोठ्या प्रमाणात वाढलेल्या घरांच्या किमती. नवी मुंबईत घर (1 BHK flat in Navi Mumbai) घ्यायचं म्हटलं की, वाशी हा पहिला पर्याय समोर येतो. पण, असे असताना देखील सिडकोला वाशीतील घरांची विक्री करण्यात यश मिळालेलं नाही. वाशी ट्रक टर्मिनलच्या जागेवर सिडकोकडून 3,139 घरांची निर्मिती सुरू करण्यात आली आहे, पण अलीकडेच काढलेल्या सोडतीत फक्त 2,651 घरांना अर्जदार मिळाले. पहिल्या फेरीत 1740 एवढ्या अर्जदारांना घरं मिळाली असली, तरी प्रत्यक्ष किती लोक खरेदी करतात, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिडको आणि राज्य शासनाने मोठ्या गाजावाजासह नवी मुंबईत तब्बल 26,000 घरांची योजना (Housing Scheme) जाहीर केली होती. त्यावेळी घरांच्या किमती 10% कमी करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं होतं. मात्र, निवडणूक संपली, महायुती सत्तेतही आली, पण घरांच्या किमती कमी होण्याऐवजी आणखी वाढल्या. त्यामुळे घर घ्यायची इच्छा असूनही अनेकांनी या सोडतीतून माघार घेतली. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फक्त घोषणाच राहिली, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ नागरिकांना मिळालाच नाही..